रत्नागिरी : जिल्हास्तरीय 'स्वच्छ सुंदर सोसायटी' स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यात 'स्वच्छता हीच सेवा' ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 'स्वच्छ सुंदर सोसायटी' जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विजेत्या सोसायटीला रोख ५० हजार रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने 'स्वच्छ ही सेवा' ही मोहीम १४ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या स्वच्छता सेवा २०२४ साठी 'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छता की भागीदार अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सोसायटी, अपार्टमेंटसाठी स्वच्छ सुंदर सोसायटी या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, ओला कचरा प्रक्रिया, प्लास्टिक कचरा साठवणूक, सांडपाणी व्यवस्थापन, घरातून बाहेर पडणारे पाणी, शौचालयातून बाहेर पडणारे पाणी, पाऊस पाणी संकलन असे निकष असणार आहेत. प्रथम मूल्यमापन तालुकास्तरीय समितीकडून केले जाणार आहे. यानंतर तालुक्यात नंबर काढून त्याची पाहणी जिल्हास्तरीय समितीकडून होणार आहे.
तालुकास्तरीय समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी तर जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ५० हजार, द्वितीय क्रमांक ३० हजार, तर तृतीय क्रमांक २० हजार व सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 19/Sep/2024
What's Your Reaction?