रत्नागिरी : Konkan Election Drama अंतर्गत कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बाळ माने यांच्या या अचानक आणि धक्कादायक माघारीनंतर शिवसेनेचे रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. माने यांनी ही उमेदवारी नक्की कोणत्या कारणास्तव मागे घेतली, यावर त्यांनी थेट सवाल उपस्थित केले आहेत.
२५ खोक्यांचा गंभीर आरोप आणि लवकरच खुलाशाचा इशारा
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करताना बिपीन बंदरकर यांनी ‘२५ खोके एकदम ओके’ असा थेट उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. “उमेडवारी मागे घेण्यासाठी कुठे पैसे घेतले गेले? आणि ते कसे घेतले गेले? याचा सर्व तपशील आपल्याकडे असून, या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच जाहीर खुलासा करणार आहे,” असे थेट विधान बंदरकर यांनी केले आहे. या विधानामुळे निवडणुकीच्या ऐन रंगात आर्थिक देवाणघेवाणीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘बाळ माने हेच खरे गद्दार’; भूतकाळातील दाखले देत टीका
बिपीन बंदरकर यांनी आपल्या टीकेचा रोख पुढे नेताना बाळ माने यांच्या राजकीय भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “रत्नागिरीतील खरा गद्दार कोण, हे आता बाळ माने यांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले आहे,” अशी टीका त्यांनी केली. बाळ माने हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात (भाजप) होते. त्याचा संदर्भ देत बंदरकर म्हणाले की, “भाजपमध्ये असताना त्या पक्षाने त्यांना सर्व काही दिले, तरीही त्यांनी भाजपशी गद्दारी केली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्व सन्मान देऊन उमेदवारी दिली असताना, त्यांच्याशीही माने यांनी गद्दारी केली आहे.” या आरोपांमुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय संघर्ष आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे.














