फणसवळे येथील तरुणाचा कावीळच्या आजाराने मृत्यू

रत्नागिरीतील दुर्दैवी घटना

रत्नागिरी:

कावीळ आजाराने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. गेल्या महिन्याभरापासून कावीळच्या तीव्र त्रासाशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाचा उप जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे फणसवळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महिनाभरापासून सुरू होते उपचार

अकाली निधन झालेल्या तरुणाचे नाव आकाश पालवे (वय ३३ वर्षे, रा. मधलीवाडी फणसवळे, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश पालवे याला गेल्या एका महिन्यापासून कावीळ (Jaundice) या आजाराचा त्रास होत होता आणि त्यावर औषधोपचार सुरू होते.

प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

गुरुवारी, २३ जुलै रोजी घरी असताना अचानक आकाश याचे पोट फुगले आणि त्याला तीव्र वेदना तसेच असह्य त्रास होऊ लागला. प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी वेळ न दवडता त्याला खाजगी वाहनाने रत्नागिरी येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली

शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी, २४ जुलै रोजी पहाटे ०१:३६ वाजता ड्युटीवर असलेल्या डॉ. शरयु यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:25 27-07-2026