नेते आणि पदाधिकाऱ्यांना वक्तव्ये करताना खबरदारी घेण्याचे आदेश
Ravindra Chavan Statement Disha Salian प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असताना, भारतीय जनता पक्षाने (BJP) यावर अत्यंत सावध आणि संयमित भूमिका घेतली आहे. "आपल्याकडे सक्षम पुरावे असल्याशिवाय दिशा सालियान प्रकरणावर अजिबात बोलू नका," असे स्पष्ट आणि कडक आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. पुराव्याशिवाय कोणत्याही गंभीर विषयावर भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
"प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने आपण काय बोलावे आणि काय सांगावे याचे भान ठेवले पाहिजे. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे माहिती नाही किंवा जोपर्यंत आपल्याकडे तिचे सक्षम पुरावे उपलब्ध नाहीत, तोपर्यंत त्यावर बोलले गेले नाही पाहिजे," असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
काही नेत्यांच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार

गेल्या काही दिवसांत भाजपच्या काही स्थानिक नेत्यांकडून दिशा सालियान प्रकरणावर वक्तव्ये करण्यात आली होती, तसेच सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दिशा सालियान ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर होती. ८ जून २०१९ रोजी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर १४ जून २०१९ रोजी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती.
एफआयआर आणि आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल झालेला आहे. या एफआयआरमध्ये थेट आरोपी म्हणून कोणाचे नाव नसले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यासह इतरांच्या नावांचा उल्लेख आहे.
दुसरीकडे, आमदार आदित्य ठाकरे यांनी याआधीच आपली बाजू स्पष्ट केली आहे. "मी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही किंवा माझी त्यांच्याशी ओळख नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापोटी आणि चारित्र्यहनन करण्यासाठीच गेल्या ६ वर्षांपासून या घटनेशी माझे नाव हेतुपुरस्सर जोडले जात आहे," असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता.













