छोट्या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईची तीव्रता टाळता येते : अॅड. अविनाश काळे

पावस : गेली अनेक वर्षे अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे गोळप परिसरात लोकसहभागातून पाण्याची बचत व्हावी, पाणीटंचाई दूर व्हावी. पाण्याचा साठा वाढावा, फुकट वाहत जाणारे अब्जावधी लिटर पाणी अडवावे, पाण्यातून समृद्धी यावी याकरिता लोक सहभागातून बंधारा बांधण्याचे कार्य सातत्याने करणे हे प्रेरणादायी आहे. हे गावोगावी झाले पाहिजे, असे मत जनसेवा मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अॅड. अविनाश काळे यांनी व्यक्त केले. छोट्या-छोट्या बंधाऱ्यातून पाणी साठवून जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आजुबाजुच्या विहिरीचे पाणी वाढते.

त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता टाळता येते, असेही त्यांनी सांगितले. अनुलोम प्रेरित जनसेवा मंडळातर्फे लोकसहभागातून गोळप मोरवठार आणि पवारवाडीच्या खाली नदीवर पुलाजवळ बांधण्यात आलेल्या ५० फूट कच्चा बंधाऱ्यांच्या कामाप्रसंगी ते बोलत होते. यावर्षी बांधलेला हा तिसरा बंधारा आहे. यासाठी लागणाऱ्या पिशव्या फिनोलेक्स कंपनी कडून उपलब्ध करून दिल्या आहेत. याप्रसंगी अनुलोमचे कोकण सहविभागप्रमुख रवींद्र भोवड, मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे, सचिव समित घुडे, सहसचिव प्रकाश संते, महेश पालकर, भाट्वे नारळ संशोधन केंद्राचे किटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, प्राध्यापक सुनील घवाळी, कृषी सहाय्यक गावखडी ज्ञानेश्वर राऊत, अनुलोमचे भाग जनसेवक तनया शिवलकर, मंगेश मोभारकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 30/Dec/2024