राजापूर : केंद्र शासनातर्फे हर घर जल देणारी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे राबवली जात आहे. यामध्ये मंजूर झालेल्या ११२ पैकी अवघ्या तीन कोटीचा निधी खर्च झाला आहे. त्यातून तालुक्यातील ५० महसुली गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. अद्यापही सुमारे दीडशे गावांना हर घर जल घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. शासनाची जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना गतवर्षी पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; मात्र पुढील दीड महिन्यात उर्वरित कामे पूर्ण होणे कठीण आहे.
या योजनेसाठी तालुक्यामध्ये सर्वेक्षण होऊन आराखडा तयार करण्यात झाला असून, त्याची ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी केली जात आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याचा निर्धार शासनाने केला होता; मात्र निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण न झाल्याने मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या ११२ कोटीच्या निधीतून २०० महसुली गावांमध्ये सध्या कामे सुरु आहेत त्यापैकी ५० गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत; मात्र मत कालावधीत दीडशे गावांना हर घर जल म्हणून घोषित होण्यासाठी प्रशासनाला नियोजबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे.
निधी नसल्याने अडचण
मार्चअखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे; मात्र गेल्या सुमारे सात-आठ महिन्यांपासून जलबीवन मिशन योजनेचा पुरेसा निधी आला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नळपाणी योजनेचे काम पूर्ण करायचे झाले तर त्यासाठी साहित्यखरेदीसह कामगारांच्या मजुरीसाठी पुरेसा पैसा हातमध्ये असणे गरजेचे आहे; मात्र निधीच नसेल तर हा खर्च कसा भागवायचा आणि कामे पूर्ण करायची की, असा सवाल एका ठेकेदाराने उपस्थित केला आहे.
राजापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे ५० गावे हर घर जल घोषित झाली आहेत. उर्वरित गावातील कामे प्रगतिपथावर असून, त्यापैकी ४२ कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. शिल्लक राहिलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत- प्रशांत पोवार, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
हर घर जल घोषित झालेली गावे
शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, वाकाळे, दसुरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर बाजारवाडी, सौंदळ, मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे हरचलेवाडी, कुंभवडे, डोगर-दत्तवाडी, मठखुर्द, सोलगाव, कुवेशी तुळसुंदवाडी, वाडावेत्वे, गोठणेदोनिवडे, वादूळवाडी, बार, भावलेवाडी, निखरेवाडी, कोदवाली- मांडवकरवाडी, मोगरे, केरावाले, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वडदहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर मुसलमानवाडी, परटवली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 21/Feb/2025
