विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा केंद्र सरकारवर घणाघात; वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांचा सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली : Rajya Sabha Hungama On Manusmriti संदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर आणि संघाच्या विचारसरणीवर जोरदार हल्लाबोल केला. या गदारोळात खर्गे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने सभागृहातील वातावरण अधिक तापले.
राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “शिक्षण हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही, तर सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. देशातील अनेक शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचा प्रभाव वाढत आहे.” पुढे बोलताना त्यांनी अभ्यासक्रमातील एका मजकुराचा संदर्भ देत गंभीर आरोप केले. “एका मजकुरात ‘शूद्राने वेदांचे पठण ऐकले तर त्याच्या कानात वितळलेले शिसे ओतावे आणि वेदमंत्र उच्चारल्यास जीभ कापावी’ अशा स्वरूपाच्या गोष्टींचा समावेश आहे. हा मजकूर अभ्यासक्रमातून तातडीने हटवण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे दलित, गरीब आणि दुर्बल घटकांतील मुले शिक्षणापासून वंचित राहत असून सरकारची धोरणे ‘मनुवादी’ विचारसरणीची आठवण करून देतात, असा घणाघातही त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांचा गदारोळ अन् नड्डांचे प्रत्युत्तर: खर्गे यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजप खासदारांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “विरोधी पक्षनेत्यांनी केलेले विधान वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. त्यांनी मनुस्मृतीचा मूळ आणि अधिकृत मजकूर सभागृहात सादर करावा.” तर भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचा आणि ऐतिहासिक ग्रंथांचा संदर्भ देत या विधानाचा निषेध केला.
वक्तव्य कामकाजातून वगळले: सभागृहातील दोन्ही बाजूंच्या वाढत्या गदारोळानंतर आणि वादानंतर सभापतींनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मनुस्मृती’ संदर्भात केलेले विधान संसदीय कामकाजाच्या अधिकृत नोंदीतून वगळण्याची (Expunged) घोषणा केली.
गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी: चर्चेदरम्यान खर्गे यांनी केंद्र सरकारवर ओबीसी, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समाजाबाबत गंभीर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. “या वर्गातील तरुण पुढे येऊ नयेत म्हणून सरकार आवश्यक भरती प्रक्रिया राबवत नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी आग्रही मागणी खर्गे यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 30-07-2026













