रत्नागिरीत १७ मार्चला शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा

रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १७ मार्चला होणाऱ्या या शोभायात्रेला रत्नागिरी शहरासह आसपासच्या गावांतील शेकडो मराठा बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून सुरुवात होऊन रात्री १० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होणार आहे. प्रथेप्रमाणे दुपारी ४ वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल.

शोभायात्रेत विविध ढोल-ताशे, झांजपथक, मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश आहे. ज्यांना चित्ररथांचा समावेश करायचा आहे. त्यांनी मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्राचीताई शिंदे, प्रदीप साळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे. रत्नागिरी शहर व पंचक्रोशीतील सर्व मराठा समाजबांधव एकत्र येऊन ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 08/Mar/2025