‘गुंगी गुडिया’ विधानावर महायुती आक्रमक; “काँग्रेसने महिलांची माफी मागावी”
Devendra Fadnavis Reaction Sunetra Pawar Gungi Gudiya संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ अशी अत्यंत वादग्रस्त टीका केली होती. या विधानावरून आता सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार हल्लाबोल केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या या विधानाचा अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचे नेते अत्यंत खालच्या स्तरावर उतरले आहेत. मुळात जनता त्यांना कोणताही प्रतिसाद देत नाहीये आणि त्यांना कुणी विचारतही नाही. त्यामुळे केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशा पद्धतीची खालच्या दर्जाची विधाने केली जात आहेत. ‘बदनाम हुए तो हुए, नाम तो हुआ’ या मानसिकतेतून त्यांची ही कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेत इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणारे लोक पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत,” असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा द्वेष: धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही काँग्रेसच्या अधिकृत वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राला सुनेत्रा पवारांच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, याचाच द्वेष आणि घृणा काँग्रेसच्या मनात आहे. काँग्रेसने स्वतःचा इतिहास आठवावा; इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांनी अत्यंत कणखरपणे देश सांभाळला. येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील त्याहून अधिक कणखर काम करून दाखवतील,” असे मुंडे म्हणाले.
महिलांची माफी मागावी; दत्ता भरणेंचा इशारा
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी काँग्रेसच्या या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला. “सुनेत्रा पवार यांचे मोठे सामाजिक योगदान असून, एक उत्तम व्यावसायिक व शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने केवळ सुनेत्रा पवारांचीच नव्हे, तर राज्यातील तमाम महिलांची माफी मागितली पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 04-08-2026














