रत्नागिरी : वरची निवेंडी येथे 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील वरची निवेंडी (बौद्धवाडी) येथे 19 वर्षीय निखिल मंगेश कदम या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (मंगळवार, 12 ऑगस्ट) रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

निखिल सोमवारी (11 ऑगस्ट) दुपारनंतर घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे काका अमर विकास कदम यांनी शोध घेतला असता, घरापासून काही अंतरावर असलेल्या वडिलांच्या मालकीच्या काजू बागेत, काजूच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत निखिल दिसून आला.

याची माहिती कुटुंबीयांना आणि गावचे पोलीस पाटील दिवाकर कदम यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ जयगड पोलीस ठाण्यात कळविले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र निखिलला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव करीत आहेत. निखिलच्या पश्चात आई, बहीण, आजोबा, काका, काकू असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण निवेंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 13/Aug/2025