Ratnagiri Crime: भक्ती मयेकर खून प्रकरण | तिहेरी हत्याकांडातील संशयितांना न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तीन संशयितांना न्यायालयाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

दुर्वास दर्शन पाटील (25, रा. जंगमवाडी, वाटद-खंडाळा, रत्नागिरी), विश्वास विजय पवार (41, रा. कळझोंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (40, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. 30) दुपारी बाराच्या सुमारास आंबाघाट येथे उघडकीस आली होती.

मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला होता. भक्ती मयेकर हिच्या खुनाचा उलगडा होताच एका पाठोपाठ एक तीन खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या हत्याकांडामुळे जिल्हा हादरला. भक्ती मयेकरचा खून करून दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाटात फेकला होता.

या खुनाचा उलगडा झाल्यानंतर दुर्वास पाटीलने भक्तीसह अन्य दोघांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह अद्यापही आढळून आलेला नाही. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुर्वास पाटील याने तीनही मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेल्या चारपैकी दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हत्याकांडमधील चौथा संशयित नीलेश भिंगार्डे याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 12-09-2025