राजापूर बुरंबेवाडी मार्गावर नव्याने बांधलेला रस्ता खचला

May 27, 2024 - 15:07
 0

राजापूर : राजापूर बुरंबेवाडी मार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या धोपेश्वर खांबलवाडी येथील पुलावर गेले दोन दिवस पडलेल्या वळवाच्या पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थ अमोल सोगम यांनी या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला आहे.

राजापूर बुरंबेवाडी हा रस्ता अतिशय निमुळता असून या मार्गावर दिवसभर मोठ्याप्रमाणात वाहतुक सुरू असते. एसटीच्या जास्त फेऱ्या याच मार्गावर धावत असतात तर रिक्षा व खासगी वाहनांची संख्याही सर्वाधिक आहे. राजापूर शहर ते पन्हळे तर्फ राजापूर या भागातील रस्ता तर खूपच अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

धोपेश्वर खांबलवाडी व पन्हळे यामध्ये असणाऱ्या एका वहाळावर यापूर्वी असणारी निमुळती मोरी वाहतुकीसाठी अडचणीची ठरत होती. त्यामुळे जिल्हा बांधकाम विभागाने याठिकाणी लाखो रुपये खर्च करून पुलाची उभारणी केली आहे. मात्र, पुलाच्या जोडरस्त्याला योग्य प्रकारे संरक्षक भिंतीचे काम न केल्याने व योग्य रित्या भराव न घातल्याने गेले दोन दिवस पडलेल्या वळवाच्या पावसात या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात
खचला आहे. त्यातच हा पूल अगदी वळणाच्या ठिकाणी असल्याने येणारी वाहने रस्ता सोडून बाहेर जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी अपघाताची शक्यता असून या पुलाचे बांधकाम व जोडरस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर पावसाळ्याअगोदर हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांमधून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow