राजापूर : जुवाठी ग्रामपंचायतीकडे खतनिर्मिती खड्ड्यांसाठी आलेला निधी लाभार्थ्यांना न मिळाल्याचा आरोप
राजापूर : तालुक्यातील जुवाठी ग्रामपंचायतीकडे स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत (टप्पा-२) तयार करण्यात आलेल्या खतनिर्मिती खड्ड्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे; मात्र ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे तो लाभार्थ्यांना मिळालेला नाही, अशी तक्रार माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
जुवाठी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ५ खतनिर्मिती खड्डे उभारण्याचे काम करण्यात आले आहे. या कामासंबंधी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता १५ मार्च २०२३ ला ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. त्याचवेळी खड्डे खोदण्याचे कामही लाभार्थ्यांनी पूर्ण केले. या खड्ड्यांसाठी देण्यात येणारा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला; मात्र हा निधी ३१ मार्च २०२४ पर्यंत खर्च करण्यात आलेला नाही. संबंधित लाभार्थींना तो न मिळाल्याने ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेला निधी परत गेला आहे. याला ग्रामसेवकाचे दुर्लक्ष जबाबदार असल्याचे मयेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे अपेक्षित असताना ग्रामसेवकाला पाठीशी घातले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 05/Jul/2024
What's Your Reaction?