राजापुरात विश्रामगृहासाठी ३ कोटींची मंजुरी : पालकमंत्री उदय सामंत

Jul 10, 2024 - 13:32
Jul 10, 2024 - 13:34
 0
राजापुरात  विश्रामगृहासाठी ३ कोटींची मंजुरी : पालकमंत्री उदय सामंत

राजापूर : राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आराखडा तयार केला जाईल, तसेच येथील विश्रामगृहासाठी ३ कोटी रुपयांची मंजुरी आणि नव्याने कम्युनिटी सेंटरसाठी दोन कोटी रुपये मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूर विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, ग्रामस्थांकडून मागणी होत असलेल्या रायपाटण का पाचल या नवीन तालुका निर्मितीबाबत कायदेशीररित्या सर्व गोष्टी तपासून बघू, तसेच दोन्ही गावच्या ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केली.

राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी राजापूर तालुक्याला भेट दिली. सर्व प्रथम वाटुळ येथील सातत्याने मागणी होत असलेल्या सुपरमल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोजित जागेची पाहणी केली. त्यानंतर शहरातील कलामंदिर येथील विद्याथ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाला ते उपस्थित होते. सामंत यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यानंतर राजापूर शासकीय विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी वाटूळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत त्यांनी घोषणा केली.

राजापूरचा विकास ज्या गतीने व्हायला हवा होता तो झाला नसल्याचे सांगत येथे प्रसिद्ध गंगा क्षेत्र आहे. श्री धूतपापेश्वर मंदिर आहे. त्यामुळे येथे चांगले विश्रामगृह असावे यासाठी येथील नवीन शासकीय विश्रामगृहाला तीन कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याचे टेंडर व पुढील काम लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर येथील कार्यक्रमांना होणारी गर्दी लक्षात घेता येथे चांगले कम्युनिटी सेंटर व्हावे यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करीत असल्याची घोषणा सामंत यांनी केली. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून २६ कोटी ६८ लाख रुपये तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १४ कोटी ७८ लाख रुपये राजापूरच्या विकासासाठी दिले आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. येत्या १३ तारखेला आपण राजापुरात येणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लागत असताना दुसरीकडे विरोधक नाहक टीका करण्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow