लांजातील नद्यांना पूर

Jul 22, 2024 - 10:03
Jul 22, 2024 - 10:44
 0
लांजातील  नद्यांना  पूर

लांजा : तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी व नावेरी या चारही नद्यांना महापूर आला असून काजळी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली होती. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे आंजणारी मठ येथील अवधुतवन स्वयंभू श्री दत्त मंदिर पुन्हा एकदा पुराच्या पाण्याखाली गेले होते. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत तीन वेळा या मंदिराला काजळी नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. काजळी नदीच्या पुराचे पाणी चांदराई बाजारपेठेत घुसल्याने लांजा-काजरघाटी- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद होती.

काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मंदिर पाण्याखाली गेल्याने गुरुवारी (ता. २१) गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. तालुक्यात २० जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी (ता. २१) सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे काजळी, मुचकुंदी आणि बेनी, नावेरी या चारही नद्यांना पूर आला आहे. काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसल्याने लांजा काजरघाटीमार्गे रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद आहे. चांदेराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री चव्हाटा मंदिर, गुरव हॉटेल याठिकाणी सर्वत्र पुराचे पाणी घुसले होते. तसेच हरचिरी बाजारपेठ येथील पुलावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाला पुराचे पाणी लागल्याने पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow