Ratnagiri : 'आरटीई' प्रवेशाला मिळाली मुदतवाढ
रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यात ५७० विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली असून, मुदतवाढ मिळाल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत.
दि. ७ जून रोजी आरटीईची ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. परंतु, काही खासगी शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी आरटीई कायद्यातील बदल रद्द करावा, याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आणि निकाल देण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिन्यापासून रखडली होती. नुकतीच निवड यादी प्रसिद्ध झाली असून, पालकांची आता प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत. त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती, अलॉटमेंट लेटर, हमीपत्राची प्रिंट आदी कागदपत्र सादर करून पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती संबंधित शाळेकडून घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून यापूर्वीच दिलेल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 02/Aug/2024
What's Your Reaction?