रत्नागिरी शहरातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त : मुख्याधिकारी तुषार बाबर
रत्नागिरी : गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी नगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे पावसाळी डांबर, खडी वगैरे साहित्य आदींचा वापर करून गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
रत्नागिरी शहरामध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागातील रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सद्यःस्थितीत दररोज पालिकेच्या बांधकाम विभागाकडून डबर, कच, पावसाळी डांबर, खडी वापरून खड्डे बुजविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने खड्डे वारंवार निर्माण होत आहेत.
गणेशोत्सव व इतर सणांचा विचार करता निघणाऱ्या मिरवणुकांच्या मार्गावरील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाहणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणच्या रस्त्यांची धूप झाल्याने तेथे भराव करणे व इतर आवश्यक ती कामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. मांडवी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक असणारा रॅम्प दुरुस्ती व मांडवी ते नाईक फॅक्टरीदरम्यान समुद्र किनारपट्टीच्या रस्त्याच्या एकदिशा वाहतुकीच्या दृष्टीने खडीकरणाचे काम ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 05-08-2024
What's Your Reaction?