राजापूर : बांबूची रोपे नसल्याने लागवडीला 'ब्रेक'
राजापूर : लोकांच्या हाताला काम आणि सोबत दाम (पैसा) मिळवून देताना जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने यावर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतर्गत बांबू लागवडीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्याला शेतकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या लागवडीसाठी आवश्यक असलेली बांबूची रोपे उपलब्ध होत नसल्याने बांबू लागवडीला काहीसा ब्रेक लागला आहे.
राजापूर तालुक्यामध्ये यावर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ७१ शेतकऱ्यांच्या २५.९६ हेक्टर क्षेत्राच्या बांबू लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २५ लाभार्थ्यांनी २०७९ हेक्टरवर बांबू लागवड केल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कुशल आणि अकुशल अशा सर्वांना रोजगार मिळतो.
त्याचवेळी वैयक्तिक फळबाग लागवडीतून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. ही योजना तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यातून, या योजनेने हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येताना अनेकांच्या हाताला काम आणि रोजगार या योजनेने मिळवून दिला आहे. यावर्षीही हे अभियान तालुक्यामध्ये राबविताना कमी श्रमामध्ये जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एप्रिल-मे महिन्यापासून पंचायत समिती प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
७७ लाभार्थ्यांची मंजुरी प्रलंबित
अद्यापही ७७ लाभार्थ्यांच्या शंभर हेक्टरवरील बांबू लागवडीचे प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित असून, सद्यस्थितीमध्ये या बांबू लागवडीसाठी रोपे उपलब्ध नसल्याची माहितीही यावेळी पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:09 PM 23/Aug/2024
What's Your Reaction?