हर्णे बंदरातील चार नौका मच्छीमारीसाठी समुद्रात

Aug 6, 2024 - 13:03
Aug 6, 2024 - 13:13
 0
हर्णे बंदरातील चार नौका मच्छीमारीसाठी समुद्रात

हर्णे : पावसाचा जोर ओसरत्यामुळे समुद्रावर स्वार होण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. हर्णे बंदरातील चार मच्छीमारी नौका सोमवारी (ता. ५) सायंकाळी मासेमारीसाठी रवाना झाल्या असून, उर्वरित नौका चार दिवसांत समुद्रात जाणार आहेत; मात्र रत्नागिरी, गुहागरसह राजापूर तालुक्यांतील मच्छीमार अजूनही वातावरण शांत होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

गेले आठवडाभर जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे १ ऑगस्टला शासनाची बंदी उठल्यानंतर मासेमारीला सुरुवात होऊनही खराब वातावरणामुळे मच्छीमारांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ६१ दिवसांचा मत्स्य प्रजोत्पादनाचा काळ असतो. शासनाकडून मासेमारीला दरवर्षीप्रमाणे परवानगी दिली जाते; परंतु पहिल्याच दिवशी हवामानाचा मासेमारीला फटका बसला. समुद्र खवळल्यामुळे नौका समुद्रात न पाठवता किनाऱ्यावरच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. 

जिल्ह्यात मिरकरवाडा आणि हर्णे ही दोन बंदरे सर्वांत मोठी आहेत. हर्णे बंदरात परवानाधारक ८०० ते ९०० लहान-मोठ्या मासेमारी नौका आहेत. वातावरण स्थिर नसल्यामुळे मच्छीमारांनी बंदरातच उभे राहणे पसंत केले. रविवारी सायंकाळपासून वातावरण स्थिर होऊ लागले आहे.

त्यामुळे मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून समुद्रात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. बर्फ, पाणी यांसह अन्य साहित्य नौकांवर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. बंदी उठवल्यानंतर पाच दिवसांनी आज चार नौका समुद्रात रवाना झाल्या आहेत. या नौका दापोलोपासून सुमारे १५ वावात दापोली ते श्रीवर्धनदरम्यान मासेमारीमार करणार आहेत. काही नौका आज समुद्रात जातील, असे मच्छीमारांनी सांगितले. जिल्ह्यातील अन्य बंदरांतील नौका शुक्रवारपर्यंत बाहेर पडणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, वातावरण खराब असले तरीही मुंबईच्या नौका १ पासूनच मासेमारीसाठी बाहेर पडल्या आहेत. त्यांना कोळंबी मिळत असून दरही चांगला आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्या नौकांना चालू कोळंबी बपर सापडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दोन महिन्यांनी मासेमारी सुरू होत असल्यामुळे मच्छीमार समुद्रात जाण्यासाठी उत्सुक असतात. यंदा वातावरणाने दगा दिल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वचजण तयारीत असून, वातारवण स्थिर झाले की लगेचच समुद्रात जाणार आहेत. आजपासून सुरुवात झाली आहे. - नंदू चौगुले, मच्छीमार, हर्णे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow