रत्नागिरीला पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Aug 7, 2024 - 12:36
 0
रत्नागिरीला पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर पूर्णतः ओसरलेला होता. सकाळी पावसाने उघडीप दिली.

दरम्यान, मंगळवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात केवळ २० मि.मी. सरासरी पाऊस झाला. यामध्ये तीन तालुक्यांत २० मि.मी. पेक्षा जास्त, तर उर्वरित तालुक्यांत २० मि.मी. पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरासह अरबी सागरातही सक्रिय झाल्याने पुढील तीन दिवस प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काहा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय प्रभावीपणे झाल्याने त्याची तीव्रता पुढील २४ तासांत कमी होण्याचा अंदाज आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीवर सक्रिय आहे. या हवामानविषयक प्रणालींचा परिणाम म्हणून संपूर्ण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow