रत्नागिरी न. प. कर्मचाऱ्यांमध्ये नव्या पेन्शन योजनेची खदखद
रत्नागिरी : राज्याच्या नगरविकास विभागाने संवर्ग आणि नगर परिषद आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजनेची खातीच काढलेली नाहीत. त्याचबरोबर या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्रसुद्धा उपलब्ध करून दिलेली नाहीत. अनेक वर्षे वाट पाहूनही नगरविकास विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशीच खेळले जात आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनासुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राज्यातील नगर परिषद, नगर पंचायती कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मागण्यांसाठी ६ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. त्यात राज्य संवर्ग आणि नगर परिषद आस्थापनेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची भर पडल्यास राज्यातील सर्व शहरांचा कारभारच ठप्प होणार आहे.
नवीन पेन्शन योजना २००५ सालापासून लागू झाली. यासंदर्भात प्रॉव्हिडंट फंड रेग्यूलेशन आयोगासोबत करार होवून शासनाने नवीन पेन्शन योजनेसाठी संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची खाती उघडण्याचा करार झाला. परंतु अद्याप करारानुसार नगरविकास विभागाने कार्यवाही केलेलीच नाही. खाती नसल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या हक्काची आर्थिक मदत मिळत नाही. खातीच नसल्याने त्यात पेन्शनची रक्कम जमा होत नाही. पर्यायाने बचत झालेल्या रकमेवर मिळणारे व्याजसुद्धा मिळत नाही. हा या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी एकप्रकारे खेळच असल्याची भावना संघटनांमध्ये वाढीस लागली आहे. त्यामुळे संवर्ग आणि आस्थापनेवरील सुमारे ३ ते ४ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. याची दखल त्यांच्या संघटनांनीसुद्धा घेतली आहे.
नगर परिषद, नगर पंचायतींमधील संवर्ग आणि आस्थापनावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक स्तरावरील कामांशी आणि लोकप्रतिनिधींसह जनतेशी थेट संबंध येत असतो. अशावेळी त्यांना शासकीय ओळखपत्रांची आवश्यकता असते. परंतु ही ओळखपत्रेही अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 09/Aug/2024
What's Your Reaction?