नारायण तलाव परिसरातील टपऱ्यांवर चिपळूण पालिकेची कारवाई
चिपळूण : शहरातील नारायण तलावाचे लोकार्पण झाल्यानंतर तेथे आता टपरी व्यवसाय हळूहळू फोफावत आहे. या टपऱ्यांमुळे नारायण तलाव परिसर भकास होईल. येथे लावण्यात येणाऱ्या टपऱ्यांवर आणि खोक्यांवर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून सुरू झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी येताच नारायण तलाव परिसरात लागलेली टपरी पालिकेने काढून टाकली. चिपळूण पालिकेने नारायण तलावाचे पुनर्जीवन करून सुशोभीकरण केले. तलावाच्या परिसरात कचरा होऊ नये म्हणून प्लास्टिक बंदीचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. कचरामुक्त तलाव ही संकल्पना या ठिकाणी राबवली आहे. तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढू नये, यासाठी तलाव बंदिस्त केला आहे; मात्र तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता टपऱ्या दिसू लागल्या आहेत. एक टपरी येथे लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शहा यांनी या संदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख मंगेश टोपरे यांना फोन करून ही टपरी काढण्याची सूचना केली. माजी नगरसेवक प्रकाश काणे, नित्यानंद भागवत, सिद्धेश लाड यांनीही नगरपालिकेत तक्रारी करून प्रभात रोड आणि नारायण तलाव परिसरात लागणाऱ्या टप्प्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नारायण तलाव परिसरात एक टपरी उभारण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर ती टपरी हटवली आहे. नारायण तलावाच्या परिसरात स्वच्छता राखणे ही शहरातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. त्या परिसरात सध्या कोणत्याही टपऱ्या लागणार नाहीत. जे फेरीवाले तेथे टपऱ्या उभारतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 22/Aug/2024
What's Your Reaction?