तासभर चाललेली घोषणाबाजी आणि राड्यानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यातून बाहेर
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून दुर्घटना झालेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्याची धक्कादायक घटना घडली. सुमारे तासभर घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप आणि धक्काबुक्की सुरू असताना दोन्हीकडचे कार्यकर्ते किल्ल्यामधून हटण्यास तयार नव्हते.
दरम्यान, आज राजकोट येथे घडलेल्या राड्याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपा नेते खासदार नारायण राणे हे दुर्घटनास्थळी पोहोचून पाहणी करत असताना आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते तिथे दाखल झाले. आदित्य ठाकरे किल्ल्याच्या परिसरात पोहोचताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. तर बाहेरच्या लोकांना किल्ल्यात घेणार नाही, अशी भूमिका राणे समर्थक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर किल्ला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तसेच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण अधिकच तंग झाले.
अखेर या तणावाच्या परिस्थितीतच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यादरम्यान, जयंत पाटील यांनी तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनीही दोन्ही बाजूंची समजूत घातली. अखेरीस आदित्य ठाकरे राजकोट किल्ला परिसरातून बाहेर पडले. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यातून बाहेर पडेपर्यंत नारायण राणे आणि त्यांचे समर्थक हे किल्ल्यामध्ये उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 28-08-2024
What's Your Reaction?