रत्नागिरी : सडामिऱ्यांच्या ग्रामस्थांचा एमआयडीसीला विरोध
रत्नागिरी : मिऱ्या येथे प्रस्तावित एमआयडीसी व पोर्ट प्रकल्पाला सडामिऱ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एकमताने काल विरोध केला. भौगोलिक परिस्थिती पाहता येथे एमआयडीसी सोयीची नसून ग्रामस्थांनी राहायचं कुठे?, बागायती नष्ट होईल, गुराढोरांनी चरायला जायचे कुठे? तेवढी जागाच उपलब्ध नसल्याने एमआयडीसीला ठाम विरोध आहे. हा विरोधाचा ठराव एकमताने मंजूर केला. हा ठराव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि एमआयडीसी विभागाला देण्यात येणार आहे.
गावातील जमिनी देण्यास ग्रामस्थांनी ठामपणे विरोध दर्शवला. स्वयंभू देवी, भराडीन देवी, शेती, आंबा बागा आणि घरे या प्रकल्पात जाऊ नयेत, असे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले. सडामिऱ्या ग्रामपंचायतीची तहकूब सभा काल घेण्यात आली. या सभेला सरपंच सायली सावंत, उपसरपंच जितेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी ग्रामस्थांनी सरपंचांना एमआयडीसी व पोर्टसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यामुळे सभेच्या सुरुवातीला ग्रामस्थांनी या विषयावरच चर्चा होऊ दे असे सांगितले. त्यामुळे कालची सभा
एमआयडीसी व पोर्ट यांनी गाजली.
सर्वांनी एकमताने विरोध केला. ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. सरपंचांनीही आपण ग्रामस्थांच्या बाजूने आहोत व ग्रामस्थ मागणीनुसार ठराव केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर एकमताने विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
एमआयडीसीसाठी जागा, जमिनी द्याव्या लागतील. तसेच गावची स्वयंभू देवी, भराडीन देवी, घरे जातील. शिवाय आंबा कलमे आणि मोठ्या प्रमाणात जागा द्यावी लागेल. त्यामुळे ग्रामस्थांना विस्थापित लागेल. आंब्यावर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आमिष दाखवण्यात आले असले तरीही आंब्याच्या बागाच शिल्लक राहणार नाहीत तर प्रक्रिया कशावर करणार, असा सवाल काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. यानंतर एकमताने विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ग्रामसेविकेने ठराव तयार केला आहे. या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांना तसेच तलाठी, एमआयडीसी यांनाही देण्याचे ठरविण्यात आले. बैठकीला प्रशांत सावंत, निशांत सावंत, विलास सावंत, सुरेंद्र सावंत, सुबोध सावंत, बाळा सावंत, कांताशेठ सावंत, मयाशेठ सुर्वे, धनराज सावंत, वसंत सावंत आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पौराणिक कथेची पार्श्वभूमी
मिऱ्या गावाला पौराणिक कथा आहे. येथील डोंगरावर औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे एमआयडीला ठाम विरोध आहे. मिऱ्या गाव पूर्वीसारखे राहिलेले नाही. आता शनिवार, रविवारीसुद्धा अनेक पर्यटक येथे येत असतात. मिऱ्या गावात शांतता आहे. आता एमआयडीसी आणून गावचे वातावरण दुषित करू नका, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 31/Aug/2024
What's Your Reaction?