रत्नागिरी : पोर्ट क्षेत्राच्या विरोधासाठी पंधरामाडची साथ मिळवण्याचे प्रयत्न
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पांढऱ्या समुद्रापासून सडामिऱ्यापर्यंतच्या सर्वच रहिवाशांचा पोर्ट औद्योगिक क्षेत्राला विरोध व्हावा, या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. जाकीमिऱ्या आणि सडामिऱ्या ग्रामपंचायतींनी या औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या सडामिऱ्या आणि जाकीमिऱ्यातील १७६.१४९ हेक्टर खासगी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भूसंपादनानंतर हे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी मिऱ्या डोंगर कापला जाऊन आंबा बागायतींचे नुकसान होण्याची ग्रामस्थांना भिती आहे. त्याचबरोबर जोरदार वाऱ्याचा धोका येथील रहिवाशांना कायमस्वरूपी राहू शकेल. इतकेच नव्हे तर मासेमारीसुद्धा अडचणीत येण्याची भिती वाटत असल्याने या पोर्ट औद्योगिक क्षेत्राला विरोध होऊ लागला आहे. जाकीमिऱ्यातील दोन गावे त्यानंतर सडामिऱ्या गावाने या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ठरावसुद्धा केले आहेत. शहर हद्दीत येणाऱ्या पंधरा माड भागापासून मिऱ्याची हद्द सुरू होते. त्यामुळे पंधरा माड येथील ग्रामस्थांचीही साथ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी जाकीमिऱ्या, भाटीमिऱ्या, सडामिऱ्या येथील स्थानिक नेते पंधरा माड येथील रहिवाशांशी सोमवारपासून संपर्क साधण्यास सुरुवात करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 02-09-2024
What's Your Reaction?