Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
मुंबई : राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे. कारण, राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला (Ladki bahin yojana) राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असून गावखेड्यात कोट्यवधी महिलांना (Women) योजनेसाठी आपले अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून महिलांना 3 हजार रुपये मिळत आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. तसेच, योजनेतील लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार, दीड कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पहिल्या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून 3000 रुपये जमा झाले आहेत.
अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे.
आधार लिंक नसल्याने येतेय अडचणी
दरम्यान, जवळपास 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनदेखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 03-09-2024
What's Your Reaction?