मिरकरवाडा बंदरावरील मच्छीविक्रेत्या महिलांना नोटीस
रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीतील मिरकरवाड्यात मच्छीमार महिलांवर प्रशासनाने कारवाई केल्याने उत्सवाच्या काळात त्या भागात संतापाची लाट उसळली आहे.
मिरकरवाडा बंदरावर नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यावर मच्छी विक्रेत्या महिला दुतर्फा बसून मच्छी विक्री करतात. त्यासंदर्भात मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाने नोटीस बजावूनही काहीही परिणाम झाला नाही. आता मच्छीमार सहकारी संस्थांकडून प्राधिकरणाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे प्राधिकरणाकडून कारवाईचे नियोजन केले जात आहे. यापूर्वी या मच्छी विक्रेत्या महिलांची मासळी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती.
मिरकरवाडा बंदरावरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. त्याचबरोबर मच्छी विक्रेत्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी तेथे मासेमारी विकास योजनेअंतर्गत नवीन मच्छी मार्केट बांधण्यात आले आहे. ते ५० मीटर लांब आणि १९.५० मीटर रुंदीचे आहे. या महिला मार्केटमध्ये विक्री करण्याऐवजी बाहेरच्या नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर दुतर्फा बसून मासळी विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांसह त्यांच्या वाहनांची गर्दी असते. तेथे मच्छीमार संस्थांचे डिझेल पंप आहेत. त्यांचे डिझेल टँकर याच रस्त्यावरून येत-जात असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मच्छिमार नौकांचे इंधन घेऊन जाण्यासाठी बॅरल घेऊन येणाऱ्या छोट्या टेम्पोंनाही तेथून येणे-जाणे धोकादायक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने संबंधित मच्छी विक्रेत्या महिलांना मार्गावर मच्छी विक्री न करता नवीन मार्केटमध्ये व्यवसाय केला नाही, तर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु या महिलांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र गणेशोत्सवाच्या काळातच या नोटिसा दिल्या गेल्याने संतापाची लाट उसळली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 09-09-2024
What's Your Reaction?