चाकरमान्यांना परतीचे वेध..!
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मुंबईत परत आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी आता सज्ज झाली आहे. गुरुवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर परतीचे वेध लागलेल्या चाकरमान्यांनी एसटीच्या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू केले आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग भागातून आतापर्यंत ३,२४८ गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले असून त्यामध्ये ८८२ गट आरक्षण तर २,३६६ वैयक्तिक आरक्षणाचा समावेश आहे. एसटीसोबतच रेल्वेनेही कंबर कसली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने परतीच्या वाटेवर असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष आरक्षित गाड्यांसह विनाआरक्षित गाड्यादेखील वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार वांद्रे टर्मिनस-मडगाव-वांद्रे टर्मिनस अशी नवी एक्स्प्रेस सुरू केली. नव्या साप्ताहिक गाडीसह विशेष मेल एक्स्प्रेसही पश्चिम रेल्वे स्थानकातून चालवण्यात आल्या.
एसटीच्या आरक्षित झालेल्या गाड्या
विभाग गट आरक्षण वैयक्तिक आरक्षण
रत्नागिरी ७१५ १८३८
रायगड १४७ ३०३
सिंधुदुर्ग २० २२५
एकूण ३२८४
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दिवा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत पोहोचून प्रवास करण्याचा त्रास वाचला. या सर्व उपाययोजनांमुळे परतीच्या वाटेवर असलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 14-09-2024
What's Your Reaction?