रत्नागिरी : विसर्जनासाठी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला पसंती अधिक
रत्नागिरी : गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याला यावर्षी मांडवीपेक्षा अधिक पसंती मिळाली. गेल्या वर्षीपर्यंत मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत तुडुंब गर्दी असायची. मात्र यावर्षी रात्री ८ वाजल्यानंतर मांडवी समुद्रकिनाऱ्याजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी गर्दी अनुभवण्यास मिळाली.
मांडवी समुद्रकिनारी दरवर्षी विसर्जन सोहळ्याला मोठी गर्दी होते. त्यानुसार पोलिसांकडून विसर्जन मार्ग आणि वाहन पार्किंगचे काटेकोर नियोजन केले जाते. या वर्षीही असेच नियोजन असल्याने गणेशभक्तांनी विसर्जन सोहळ्यासाठी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला पसंती दर्शवली. त्यामुळे मांडवीपेक्षा भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका आणि भक्तांची गर्दी अधिक होती.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी फारच अरुंद रस्ता असल्याने दरवर्षी भूते नाक्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत मिरवणूक पुढे करताना बंदोबस्तातील पोलिसांची दमछाक होते. समुद्राकडे जाणाऱ्या मिरवणुका आणि विसर्जन करून येणाऱ्यांची गर्दी झाल्याने अरुंद रस्त्यावर फारच धक्काबुक्की व्हायची; परंतु भाट्ये समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी पुरेसा रस्ता असल्यानेच विसर्जनासाठी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला या वर्षी मांडवीपेक्षा अधिक पसंती मिळाल्याचे सांगितले जात आहे. भाट्ये किनारी वाहनांचे पार्किंग करणेही सोपे जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 9/14/2024
What's Your Reaction?