रत्नागिरी : अद्याप माशांचे प्रमाण कमीच..!
रत्नागिरी : पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली असली तरी अद्याप मच्छीमारांना पुरेसे मासे मिळत नाहीत. वेळोवेळी वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नौका अजूनही बंदराजवळ नांगरावरच आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
माशांच्या प्रजननाचा काळ आणि खवळलेला समुद्र यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदी असते. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंदच असते. १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली. मच्छीमार जोरदार तयारी करीत असताना समुद्रात उठलेल्या वादळामुळे अनेकदा मासेमारी बंद ठेवावी लागली. आठ महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून आरंभ झाला; मात्र वातावरणातील बदलामुळे वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने पर्ससीननेट नौकाही किनाऱ्यावरच ठेवण्यात आल्या आहेत. तरीही काही नौका मासेमारीसाठी जात असल्या तरी मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांना हात हालवत यावे लागत आहे. पर्ससीननेट मासेमारी सुरू झाली तरीही अनेक मालकांना आपल्या नौका किनाऱ्यावरच ठेवाव्या लागल्या आहेत. पुरेसे खलाशी नसल्याने नौका समुद्रात नेणार कशी, असा प्रश्नदेखील मालकांना सतावत आहे. त्यामुळे मासेमारी सुरू होऊनही नौका किनारी असल्याने नुकसान सोसावे लागत आहे. समुद्रात जाण्यासाठी लागणाऱ्या डिझेलया खर्चही भागत नसल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे. काही नौका समुद्रात मासेमारीसाठी जात असल्या तरी त्यांना मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. बांगडा व अन्य कमी प्रतीचे मासे जाळ्यात मिळत आहेत. त्यांना चांगला भाव येत नसल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 9/14/2024
What's Your Reaction?