शेतकरी होऊन निसर्गातील आनंद शोधून स्वतः रोजगार निर्मिती करा : आनंद देसाई
रत्नागिरी : शेतकरी व्हा आणि निसर्गात आनंद शोधून स्वतः रोजगार निर्मिती करा, असे मार्गदर्शन उद्योजक आनंद देसाई यांनी केले. रत्नागिरी शिक्षण संस्था संचलित अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शंकर डोले स्टुडेंट्स एन्ट्रीचमेंट सेल उपक्रमांतर्गत आनंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकतेचा विकास या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नोत्तर या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आनंद देसाई यांनी आपण स्वतः उद्योजक म्हणून कोणकोणत्या प्रसंगांना तोंड दिले आणि त्यावर कशा पद्धतीने मात केली हे विद्यार्थ्यांसमोर विविध प्रसंगाद्वारे मांडले.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक, प्रा. विद्याधर केळकर, वाणिज्य शाखाप्रमुख शिल्पा तारगावकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेच्या विकासासाठी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात याबद्दल प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी अशा कार्यक्रमांमधूनच भावी उद्योजक घडतात, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील २१२ विद्यार्थी तसेच अदिती घाणेकर आणि भालचंद्र रानडे हे शिक्षक उपस्थित होते. स्वागत आणि प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रभात कोकजे आणि आभार मधुरा करमरकर यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:51 PM 9/14/2024
What's Your Reaction?