प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sep 18, 2024 - 13:32
Sep 18, 2024 - 13:32
 0
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न समोर आला असून, तो गंभीर असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. ऑगस्टमध्ये मी स्वतः म्हटलो होतो की, राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची रणनिती आखली जात आहे. तर लोकांनी मला म्हटलं की तुम्ही हवेत गप्पा करत आहेत. पण परदेशात याचं प्लॅनिंग केलं जात असून, देशात त्याची अंमलबजावणी होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

मंत्र्यासह आमदाराची राहुल गांधींवर हल्ल्याची भाषा 
उत्तर प्रदेशातील एक मंत्री, महायुतीतील एक आमदार आणि इतर काहीजण एकाच भाषेत राहुल गांधींवर बोलत आहेत. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याच्या गोष्टी ते करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. कोणी राहुल गांधी यांना आतंकवादी म्हणतोय तर काही जण त्यांची जीभ काढा असं म्हणतायेत, तर काहीजण हल्ल्याची भाषा करत असल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पूर्ण विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. रशियामध्ये जे होत आहे ते भारतात होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना खतम केलं जात असल्याचे संजय राऊत म्हणाले. काहीजण राहुल गांधी यांचे हाल त्यांच्या वडिलांसारखं आणि त्यांच्या आजीसारखं करण्याचे बोलत असेल आणि गृहमंत्री शांत बसत असतील तर ही एक रणनीती आहे. त्याच्यामध्ये ते सुद्धा सहभागी आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. सगळ्यात आधी मी ही गोष्ट समोर आणली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात एक मोठी रणनीती आखली जात आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचार काहीजण करत आहेत असं राऊत म्हणाले. 

नरेंद्र मोदी यांना संविधान आणि कायद्याची काही माहिती नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान आणि कायद्याची काही माहिती नाही. म्हणूनच ते सरन्यायाधीशांकडे आरतीला जातात आणि त्याचा व्हिडिओ समोर आणतात. प्रधानमंत्री जनतेला मूर्ख समजतात असं राऊत म्हणाले. सरकारच्या विरोधातील अनेक प्रकरणं सरन्यायाधीशांकडे कोर्टात सुरू असल्याचे राऊत म्हणाले. प्रधानमंत्री आणि सर न्यायाधीशांच्या मधुर संबंधांची पुष्टी झाली असल्याचे राऊत म्हणाले. याप्रकारे नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांनी संबंध प्रस्थापित झाले आहेत त्यातून आम्ही आता काय न्यायाची अपेक्षा करणार असंही राऊत म्हणाले. 

कोर्टानं जरी न्याय दिला नाही तरी जनता आम्हाला न्याय देईल 
आम्हाला तारखांवर तारखा देऊन गुंतवलं गेलं आहे. एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी अभय दिलं असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं आज काय होतं याकडं आमचं अजिबात लक्ष नाही. आम्हाला न्याय मिळणार नाही असेही राऊत म्हणाले. या सगळ्यावर सरन्यायाधीश निवृत्तीनंतर भाष्य करतील. अनेक सरन्यायाधीश निवृत्तीनंतर खुलेपणाने बोलत असतात. त्यामुळं कोर्टानं जरी न्याय दिला नाही तरी जनता आम्हाला न्याय देईल असे राऊत म्हणाले. 

सरन्यायाधीशांनी सरकार विरोधातले खटले चालवण्यास असमर्थ आहे असं सांगावं
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात मी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीला गेलो म्हणून काही लोकांच्या पोटात दुखते. लोकांच्या पोटात दुखणार नाही त्यापेक्षा जास्त वेदना होतील. कारण, तुम्ही कायदे नियम राज शिष्टाचार हे सगळं खतम केलं आहे.. संविधान तुम्हाला अशा प्रकारे परवानगी देत नाही असंही राऊत म्हणाले. सरन्यायाधीशांनी सरकार विरोधातले खटले चालवण्यास मी असमर्थ आहे असं सांगावं असंही राऊत म्हणाले. 

मुंबईच्या जागा वाटपाचा विषय संपलेला 
आज महाविकास आघाडीची बैठक आहे, चर्चा करुन तीन पक्ष एकत्र येतील असेही राऊत म्हणाले. पुढील दोन-तीन दिवस आम्ही या सगळ्यावर चर्चा करु. काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की लवकरात लवकर आपण बैठक घेऊन जागावाटपावर निर्णय घेतला पाहिजे. आजपासून तीन दिवस आम्ही बैठका घेणार आहोत. जवळजवळ मुंबईच्या जागा वाटपाचा विषय संपलेला असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 18/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow