केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज रत्नागिरीत
रत्नागिरी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी रत्नागिरीत येत असून, ते जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी आरपीआय आठवले गटाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ते रत्नागिरीत येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांबाबत शासकीय विश्रामगृहावर बैठकीत आढावा घेणार आहेत. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असून, दुपारी १२ वाजता हॉटेल विवेकच्या मैदानावर आयोजित मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. यावेळी त्यांचा जिल्ह संघटनेच्यावतीन जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात दलितमित्र व राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चेंडे, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त डॉ. राजेश जाधव आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते तु. गो. सावंत गुरुजी यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री उदय सामंत, खा. नारायण राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत, आरपीआयचे केंद्रीय कार्यकारिणी महासचिव अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे याची उपस्थिती राहणार असून, सभेचे अध्यक्षस्थान प्रितम रुके भुषविणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी पक्षप्रवक्ता अनिल जाधव, तालुकाध्यक्ष विलास कांबळे आणि जिल्हासरचिटणीस व मंडणगडचे नगरसेवक आदेश मर्चेंडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 20-09-2024
What's Your Reaction?