विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सीजेपीची मोठी घोषणा; देशभरात दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेणार
मुंबई: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सुनावणीतील एका टिप्पणीचा आधार घेत स्थापन झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) आपली पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ही घोषणा केली. पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पद स्वतः अभिजीत दिपके यांच्याकडे असणार आहे.
नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावर सीजेपीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या महिनाभराच्या आंदोलनानंतर सरकारला नमते घ्यावे लागले होते आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला होता. या आंदोलनानंतर सीजेपी आता एक राजकीय दबाव गट (Pressure Group) म्हणून कार्य करेल, असे दिपके यांनी जाहीर केले होते.
छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सीजेपीच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिपके यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीची माहिती दिली.
पक्षाने पुढील सहा महिन्यांत राज्य समन्वय समित्या तसेच लोकसभा आणि शहर पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या नावांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याची निवड झालेली नाही, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सीजेपीची घोषित राष्ट्रीय कार्यकारिणी:
| पद / जबाबदारी | नियुक्ती |
|---|---|
| संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक | अभिजीत दिपके |
| सह संयोजक | आशुतोष रांका, सौरव दास |
| राष्ट्रीय संघटना प्रभारी | अजिंक्य शिंदे |
| संघटना सह प्रभारी | दीपक बलियान |
| राष्ट्रीय सचिव | अफ्रीन नवाज |
| मीडिया प्रमुख | विजय रेड्डी मलंगी |
| कायदेविषयक घडामोडी प्रमुख | रत्ना सिंग |
| रिसर्च अँड पॉलिसी लीड | वैष्णवी गौर |
| टेक्नोलॉजी लीड | रोहन देशपांडे |
| फायनान्स लीड | योगेश इंगळे |
विभागीय प्रमुख:
- उत्तर विभाग: दीपक बलियान
- दक्षिण विभाग: विजय रेड्डी मलंगी
- पूर्व आणि ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज
- पश्चिम विभाग: योगेश इंगळे
“आंदोलनामुळे लोकांच्या मनातील भीती संपली”
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, “जे सरकार सहजासहजी राजीनामा घेत नाही असे म्हटले जात होते, त्या सरकारला ‘जेन झी’ने (Gen Z) झुकवले. या आंदोलनामुळे अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात असलेली सरकारची भीती पूर्णपणे नष्ट झाली आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा आमचा सर्वात मोठा विजय नसून, नागरिकांच्या मनातील भीती संपणे हे खरे यश आहे. आता नागरिक सरकारला प्रश्न विचारतील आणि वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरतील.”
सप्टेंबर महिन्यात सीजेपीकडून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ हे मोठे अभियान राबवले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे प्रतिनिधी देशभरात दौरा करून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:25 07-08-2026














