Ratnagiri Nyayavedh Sabha: संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी रविवारी रत्नागिरीत ‘न्यायवेध सभा’

प्रख्यात वकील ॲड. असीम सरोदे यांचे मुख्य मार्गदर्शन

रत्नागिरी:

संविधानावर आधारित लोकशाही मूल्यांचे रक्षण, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये या विषयांवर व्यापक जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी शहरात ‘न्यायवेध सभा’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जे. के. फाइल परिसरातील ‘रॉयल बँक्वेट हॉल’ येथे पार पडणार आहे.

ॲड. असीम सरोदे यांचे होणार व्याख्यान

या सभेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील, संविधान विश्लेषक व नागरीहक्क भाष्यकार ॲड. असीम सरोदे उपस्थित राहणार आहेत. ते “संविधान, न्याय आणि लोकशाहीसाठी संवाद” या विषयावर विचार मांडणार असून, उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

‘लॉ लॅब इनोव्हेशन्स’ आणि ‘जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि आवाहन

संविधानाचा सन्मान राखणे, सर्व जाती-धर्मांतील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि नागरिकांमध्ये त्यांच्या मूलभूत कर्तव्यांविषयी सजगता निर्माण करणे हा या सभेचा मुख्य उद्देश आहे.

  • उपस्थितीचे आवाहन: सभेचे निमंत्रक तथा जनहित फाउंडेशनचे संस्थापक प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, तरुण आणि सजग नागरिकांना या विचारमंचावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 22-08-2026