Ratnagiri Coastal Ganeshotsav: गणेशोत्सव काळात समुद्रावर नौकांचा विसावा; कोळी बांधवांनी मासेमारी थांबवून जपली बाप्पाची परंपरा

Ratnagiri Coastal Ganeshotsav: गणेशोत्सव काळात समुद्रावर नौकांचा विसावा; कोळी बांधवांनी मासेमारी थांबवून जपली बाप्पाची परंपरा

दापोलीसह कोकणातील किनारपट्टीवर मासेमारी बंद; श्रद्धेपुढे व्यवसाय दुय्यम मानत कोळी समाज बाप्पाच्या भक्तीत तल्लीन

दापोली : कोकणात गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत असतानाच, दापोलीसह संपूर्ण कोकणच्या किनारपट्टीवर एक वेगळेच शांत आणि मंगलमय चित्र पाहायला मिळत आहे. वर्षभर अथांग समुद्राशी दोन हात करत मासेमारी करणारे कोळी बांधव सध्या मासेमारी थांबवून कुटुंबासोबत बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत. गणरायाच्या आगमनासाठी मासेमारी नौकांना समुद्रकिनारी विसावा देण्यात आला असून, त्यामुळे नेहमी गजबजलेली बंदरे आणि किनारे सध्या पूर्णपणे शांत झाले आहेत.

कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून घराघरांत जपली जाणारी एक भावनिक परंपरा आहे. चाकरमानी गावी परतले असून घरे सजली आहेत. समुद्रामध्ये रोजच्या जगण्याची झुंज देणाऱ्या कोळी समाजानेही गणपतीची प्रतिष्ठापना, पूजन, आरती आणि पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी मासेमारीला काही दिवसांचा विराम दिला आहे.

श्रद्धेपुढे व्यवसाय दुय्यम

मासेमारी हा कोळी बांधवांचा प्रमुख पारंपारिक व्यवसाय असून प्रत्येक दिवसाची कमाई त्यांच्यासाठी मोलाची असते. गणेशोत्सवात मासेमारी बंद ठेवल्याने उत्पन्नावर निश्चितच परिणाम होतो; मात्र वर्षानुवर्षे चालत आलेली ही सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी कोळी समाज श्रद्धेने व्यवसायाला विश्रांती देतो. किनाऱ्यावर रांगेत उभ्या असलेल्या या नौका केवळ विश्रांतीचे प्रतीक नसून त्या कोळी बांधवांची बाप्पावरील अथांग श्रद्धा आणि कुटुंबाप्रती असलेल्या ओढाळ नात्याची साक्ष देत आहेत.

कुटुंबासाठी आणि परंपरेसाठी वेळ

दिवस-रात्र समुद्रात माशांचा शोध घेणाऱ्या या कष्टकरी समाजासाठी गणेशोत्सवाचे हे दिवस अत्यंत खास असतात. या दिवसांत व्यवसायापेक्षा श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबासोबतचा आनंद या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. उत्सवाचा हा जलोष संपल्यानंतर या नौका पुन्हा एकदा समुद्राच्या लाटांवर स्वार होतील आणि कोळी बांधवांची जीवनगाथा पुन्हा अथांग पाण्यात सुरू होईल.