पश्चिम महाराष्ट्रातून फुलांचा मोठा पुरवठा; दर २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा, व्यापाऱ्यांना ‘ना नफा ना तोटा’

रत्नागिरी:
यंदा गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरीच्या बाजारपेठेत फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. यंदा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून रत्नागिरीत फुलांचा पुरवठा सुरळीत आणि मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी, फुलांचे दर २० ते २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरात घसरण झाली असली तरी गणेशोत्सवासाठी फुले आणि हारांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने बाजारात तब्बल १० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

शेवंती, बटन गुलाबासह तयार हारांना मोठी मागणी

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या गणेशोत्सवात दरांमध्ये मोठी वाढ होत असली तरी यंदा विक्री १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे सुरू आहे. सध्या बाजारात शेवंती ४०० रुपये किलो, तर बटन गुलाब ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजारात लाल, पांढरी, पर्पल आणि बटन अशा विविध प्रकारच्या शेवंतीची आवक वाढल्याने ग्राहकांना निवडीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुट्या फुलांपेक्षा ग्राहकांकडून तयार हारांना सर्वाधिक पसंती दिली जात असून, बाजारात २० रुपयांच्या साध्या हारापासून ते १५० रुपये आणि १,००० रुपयांपर्यंतच्या विशेष हारांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
दर घसरल्याने व्यापाऱ्यांना ‘ना नफा ना तोटा’
रत्नागिरीच्या बाजारात एकूण १० लाखांची उलाढाल झाली असली, तरी दरांमध्ये झालेली घसरण आणि वाढलेली आवक यांमुळे व्यापाऱ्यांच्या हाती मोठा नफा उरलेला नाही. आवक भरपूर असल्याने विक्री तर झाली; मात्र अपेक्षित नफा न मिळाल्याने यंदाचा व्यापार ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावरच पार पडल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया स्थानिक विक्रेत्यांनी दिली आहे.













