मुदतीत साहित्य न हटवल्यास २३ सप्टेंबरपासून थेट प्रशासकीय कारवाई; होणारा खर्च संबंधित मालकांकडूनच वसूल करणार

रत्नागिरी:
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात मोडकळीस आलेल्या व विनावापर नौका, नौका केबिन तसेच अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याने बंदरातील दैनंदिन कामकाज आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नौका मालकांनी हे सर्व साहित्य स्वखर्चाने २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत हटवावे, असा स्पष्ट इशारा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.

२३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रशासनाची थेट कारवाई

दिलेल्या मुदतीत साहित्य न हटवल्यास २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून विभागाकडून ते थेट बंदरातून हटवण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान साहित्याचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही, तसेच नुकसान भरपाईचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही. एवढेच नव्हे तर या सर्व कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित नौका मालकांकडून वसूल केला जाणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
जेटीवर अनधिकृत पार्किंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई
दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेटी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगला सक्त मनाई करण्यात आली आहे. या दिवशी अनधिकृतपणे वाहने उभी करून शासकीय कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.













