गौरी-गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावरील कचऱ्याचे संकलन; नागरिकांना दिली स्वच्छतेची शपथ
रत्नागिरी : शहरात कालच पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून आज सकाळी ऐतिहासिक मांडवी समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता महाअभियान राबवण्यात आले. ‘सागरी सीमा मंच, रत्नागिरी’ यांच्या वतीने आयोजित या मोहिमेत रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध संस्थांचा मोहिमेत सक्रिय सहभाग

मांडवी समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात विविध क्षेत्रांतील संस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यामध्ये लायन्स क्लब, मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, मांडवी पर्यटन विकास सेवा संस्था, तसेच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे संकलन
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमुळे आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे किनाऱ्यावर पडलेले निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचऱ्याचे या वेळी स्वयंसेवकांनी पद्धतशीर संकलन केले. अवघ्या काही तासांत सर्व कचरा गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला.
उपस्थितांना दिली स्वच्छतेची शपथ
"आपली मांडवी… आपली जबाबदारी" हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी मोहिमेच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिकांना समुद्रकिनारा व शहर कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. रत्नागिरीच्या पर्यटनाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केले.













