राजापूर : राजापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये शून्य शिक्षक आहेत. काही शाळांमधील शिक्षकांना कामगिरीवर काढण्यात आले आहे; मात्र त्यांचा पगार मात्र मूळ शाळेमधूनच होतो. प्रत्यक्षात शिक्षक तिथे नसतो त्यामुळे तिथे कंत्राटी शिक्षकही नियुक्त करता येत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. त्यामुळे राजापूर तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, काही शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासह माजी आमदार साळवी यांनी गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील शाळांच्या समस्यांचा पाढाच वाचला. शाळांमधील शिक्षकांना कामगिरीवर काढत असताना त्या त्या केंद्रात शिक्षकांच्या नियुक्त्या करा. दुसऱ्या केंद्रात पाठवू नका. तसे काही ठिकाणी झालेले असून यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत, असे मत कारवली सरपंच सुरेश ऐनारकर यांनी व्यक्त केले. शिक्षकांना कामगिरीवर काढत असताना त्या-त्या शाळेतील व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांना विश्वासात घेऊन कामगिरी काढण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील निर्माण होणाऱ्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अन्यथा पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा साळवी यांनी दिला.
शिक्षक कमी असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. त्यासाठी शिक्षकांचा समतोल साधला गेला पाहिजे. सध्या कंत्राटी शिक्षक नेमणुका केल्या जात आहेत. त्याचा लाभ कमी शिक्षक असलेल्या शाळांना दिला जावा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे. – राजन साळवी, माजी आमदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 28/Dec/2024












