चिपळूण : सह्याद्रीच्या रांगांमध्ये विस्तारतंय पर्यटन

चिपळूण : सह्याद्रीच्या रांगांमध्ये पर्यटन विस्तारायला सुरवात झाली आहे. विशेषतः चिपळूण तालुक्यात गेल्या तीन-चार वर्षांत पर्यावरणाविषयी झालेल्या विविध चळवळीमुळे हजारो पर्यटक या भागातील जैवविविधतेकडे पावले टाकू लागले आहेत. यातून नवे अर्थकारण जन्म घेत आहे. अनेक तरुण या संधीवर स्वार होत नव्या कल्पना आणून पर्यटनाच्या या नव्या ट्रेंडला बळकटी देत आहेत.

सह्याद्रीच्या अथांग रांगामुळे चिपळूण तालुका निसर्गसंपन्न आहे. पश्चिम घाटात येणाऱ्या या तालुक्यात विपुल प्रमाणात जैवविविधता आहे. नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत, जंगलांनी समृद्ध परिसर यामुळे या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजातींनी आश्रय घेतला आहे. हे दुर्मिळ वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकावे यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील रघुवीर घाट, चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट, दसपटी आणि पंधरागाव परिसरातील जंगलव्याप्त भागामध्ये पर्यटन विस्ताराला सुरवात झाली आहे.

तालुक्यातील तळसर गावच्या माथ्यावर असलेल्या भाटे या परिसरात पाटण व चिपळूण तालुक्यातील स्थानिक पर्यटक येतात त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील लोकही सह्याद्रीतील निसर्ग अनुभवण्यासाठी येत असतात. येथे पाण्याचे नसर्गिक स्रोत आहेत. तंबू ठोकून राहण्यासाठी मोकळी जागा आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षण, चित्रीकरण आणि वनसंपदेचा अभ्यास करण्यासाठीसुद्धा
पुणे-मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील लोक येतात. कोयना आणि तळसर येथून दोड ते दोन तासाचा पायी प्रवास करून भाटेचा परिसर गाठता येतो. प्रसिद्ध पर्यटनस्थळ व निसर्गप्रेमी, दुप्रिमी, ट्रेकर्स याचा आवडता वनदुर्ग म्हणून वासोटा किल्ल्याची ओळख आहे. कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. पोफळीसह कोळकेवाडीतील पायवाटेने या किल्ल्यापर्यंत जाता येते.

चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीरांगांमध्ये निसर्ग पर्यटनासाठी खूप संधी आहे. यासाठी जंगले वाचवणे गरजेचे आहे. पक्षी, वन्यजीव आणि इतर माहिती लोकांना करून देणे गरजेचे असून, वृक्ष लागवडही तितकीच महत्वाची आहे. भारतात आढळणारी दुर्मिळ घुबडे या ठिकाणीच सापडतात. पक्ष्यांबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करणे देखील काळाची गरज आहे. पर्यटनातून लोकांना रोजगाराची साधने निर्माण होत आहेत. यासाठी मुलांना शाळास्तरावर पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जंगलसफारी आणि खाडी पर्यटनासाठी बाहेरचे लोक येतात. स्थानिकांमध्येही त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. – संदेश संसारे, चिवेली, ता. चिपळूण

हाऊसबोर्डची संकल्पना
चिपळूण तालुक्याला समुद्रकिनारा नाही; मात्र येथे लाभलेल्या खाडीकिनारी काही गावांमध्ये घरगुती निसर्ग व वन्यजीव पर्यटन केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे खाडी पर्यटनाला चालना मिळाली आहे. खाडीलगतच्या काही गावांमध्ये हाऊसबोर्डची संकल्पना उदयास येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:26 PM 01/Jan/2025