चार स्तंभांवरील विश्वास ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण : विजय कुवळेकर

रत्नागिरी : कोणताही व्यवसाय विश्वासावरच अवलंबून असतो. माणसाच्या आयुष्यातून विश्वास वजा केला तर काही शिल्लक राहत नाही. शिक्षणाने फक्त पदवी मिळून उपयोग नाही तर संस्कार मिळायला हवा, शिक्षणाने चारित्र्य घडवलं पाहिजे. तेव्हाच विश्वास बसतो. वाचकाचा व प्रेक्षकांचा नकाराधिकार ही आपल्याकडची मोठी ताकद आहे. तिचा वापर आपण सजग व्यक्तींनी योग्य वेळी केला पाहिजे. भारताच्या चार स्तंभांवरचा विश्वास जर ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण असतं. पण पुढच्या काळामध्ये याचे दुष्परिणाम दिसायला लागतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.

करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या आठव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी चिपळूण येथील प्रसिद्ध सीए विवेक रेळेकर उपस्थित होते. त्यांनी सीए, करसल्लागार यांच्या कामकाजाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. मंचावर करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, कोषाध्यक्ष अभिजित पटवर्धन, सचिव वैभव देवधर उपस्थित होते.

श्री. कुवळेकर म्हणाले की, लहान मूल आईच्या कुशीत निर्धास्थपणाने विसावतं किंवा आईजवळ बिलगतं. त्याला विश्वास असतो, तो त्याला सांगता येत नाही. पती-पत्नी मैत्री, शिक्षक- पालक- विद्यार्थी, डॉक्टर- रुग्ण, वकील- अशील आर्थिक संस्था, दुकानदार- ग्राहक या सर्वांमध्ये विश्वास असावा लागतो. डॉ. राधाकृष्णन असं म्हणाले होते की, माणसाला माणूस बनवतो ते खरं शिक्षण. आपण शिक्षणाची सांगड ही पदव्यांशी जोडलेली आहे. पदव्यांमधून आर्थिक उत्पन्नाशी जोडलेली आहे. सुदैवाने मोदी सरकारने जे नव शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे त्यात संस्कारालाही महत्त्व आहे. आज मोठ्या शहरांपासून अगदी ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यांतही फ्लेक्स, होर्डिंगचे साम्राज्य दिसते, असे सांगत सी. व्ही. रमन, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, रामभाऊ म्हाळगी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आदींचे संदर्भ देत कुवळेकर यांनी सुरेख मांडणी केली.

नैराश्य, घटस्फोटांचे प्रमाण वाढले
श्री. कुवळेकर म्हणाले, समाजात सध्या नैराश्य आणि घटस्फोटांचे वाढले आहेत. लग्न झाल्यानंतर अत्यंत थोड्या कालावधीत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेय. मुलांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याचं कारण आई-वडिलांपासूनचा स्वतंत्र राहण्याने येणारा दुरावा आणि त्यातून येणारी असुरक्षितता. नवरा मोठ्याने घोरतो, वाढदिवसाला आवडीचा केक आणला नाही म्हणून घटस्फोट घेतला जातोय. पण यात व्यवहार आला, विश्वास नाही आणि पती-पत्नी हे नातं विश्वासाचं नातं आहे.

डॉ. पेठे, सीए जोशींचा सत्कार
रत्नागिरीतील डॉ. प्रसाद पेठे यांच्या रुग्णसेवेबद्दल आणि उल्लेखनीय यशाबद्दल सीए अक्षय जोशी यांचा या वेळी विशेष सन्मान करसल्लागार असोसिएशनने केला. डॉ. पेठे यांनी रुग्णसेवेतील काही अनुभव सांगितले. सीए जोशी यांनीदेखील सीए, डिसा व अन्य पदवी परीक्षेतील यश कीर्तनसेवा यांची माहिती देत हा घरचा सन्मान असल्याबद्दल आभार मानले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 08-01-2025