खेड : खेड शहरात वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कॅफे कॉर्नर ते बसस्थानक मार्गावर सातत्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. भरणेनाक्यावरही वाहतूककोंडी होत असून, महामार्गावरील अवघड वळणामुळे अपघातही होत आहेत.
हॉटेल कॅफे कॉर्नर ते बसस्थानक मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. याच मार्गावर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, सेतू कार्यालय असल्याने दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते; मात्र पूरक प्रमाणात पार्किंग व्यवस्था नसल्याने काहीजण रस्त्यालगतच वाहने उभी करतात. यामुळे होणारी वाहतूककोंडी साऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस ठाण्यासमोरच होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. हॉटेल कॅफे कॉर्नरनजीक निमुळत्या मार्गावर वाहने वळवताना वाहतूककोंडी होत आहे. यावर अद्यापही नगरपालिकेने ठोस उपाययोजना केलेली नाही. येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचे खापर पोलिस यंत्रणेवर फोडण्यापलीकडे काहीच केले जात नसल्याने प्रश्न गंभीर बनत आहे. हॉटेल कॅफे कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दुकानासमोर खरेदीसाठी जाण्यासाठी वाहने सत्यालगतच उभी केली जातात. यापूर्वी पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम थंडावल्याने वाहनचालकांचे फावत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतूककोंडीच्या विळख्यात अडकत आहे. पोलिस यंत्रणेने ही बाव गांभीर्याने घेऊन निष्काळजीपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
भरणेनाक्यावरील महामार्गालगत असलेल्या अवघड वळणावर मोठी वाहने वळवताना अनेक अपघात घडत आहेत. हे अवघड वळण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 09/Jan/2025












