खेड : खेड तालुक्यातील घेरारसाळगड गावातील ओझरवाडी गांव देवघर (वाक्षेपवाडी) व हुंबरी (खालची) या दोन गावांच्या मध्यभागी ओझर खोंड्यात वसलेली आहे. या ओझरवाडीला दळणवळणाचा जवळचा मार्ग देवघर (वाक्षेपवाडी) व हुंबरी (खालची) आहे. ओझरवाडी सध्या विकासाच्या प्रतिक्षेत आहे. सदरवाडी स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्याने जोडली गेली नसल्याने या वाडीतील नागरीकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याची सोय नसल्याने आजारी रूग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोळीचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. ओझरवाडी जवळून ओझरओढा वाहत असुन या ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. पावसाळ्यात चार महिने या वाडीतील नागरीकांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो. पावसाळ्यात चार महिने या वाडीतील विद्यार्थी शाळा कॉलेजला जाऊ शकत नाही.
प्रत्येक वर्षी स्थानिक ग्रामस्थ ओझर ओढ्यावर स्वतः मेहनत करून लाकडाचा साकव घालत असतात परंतु जास्त पाऊस झाल्यावर प्रत्येक हंगाम मध्ये दोनतीन वेळा लाकडी साकव वाहून जातो. मागील अनेक वर्षे जीव धोक्यात घालून ओझरवाडीतील नागरिक जीवन जगत आहेत.
या ओझरवाडीला रस्त्याची व फुटब्रिजची सुविधा होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु आजपर्यंत कोणीही या ओझरवाडीतील गरिब जनतेची दखल घेत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून शासनाविरूध्द नाराजी प्रकट होत आहे. प्रत्येक निवडणुकीत कामे करण्याची लोकप्रधीनिधींकडून आश्वासने दिली जातात परंतु निवडणुका पार पडल्या नंतर नेत्यांना विसर पडतो. ओझरवाडीतील नागरिकांच्या मांगण्यांची दखल शासनाने न घेतल्यास लवकरच तहसिलदार कार्यालय, खेड समोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा घेरारसाळगड गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 28/Jan/2025













