रत्नागिरी : उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या लागणाऱ्या पालू गावासह (ता. लांजा) तालुका लवकरच टंचाईमुक्त होणार आहे. आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी त्यासाठी धाडसी पाऊल टाकले आहे. त्यांच्या प्रयत्नातून सुमारे ५५ कोटींची पालू लघुपाटबंधारे योजना मंजूर झाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया होऊन धरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
आमदार किरण सामंत यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा चंग बांधला आहे. आमदार झाल्यापासून त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. यापूर्वी त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधीच्या विकासकामाचा आराखडा दिला आहे. तो आराखडा मंजूर झाल्यास मतदारसंघाचा, मूलभूत, पायाभूत आणि आर्थिक विकास होणार आहे. प्रत्येक गावाची, वाडीवस्तीचा आढावा घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. लांजा तालुक्याचा पाणीटंचाईचा ज्वलंत विषय त्यांनी हाताळला असून, तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
पालू (ता. लांजा) येथून दरवर्षी उन्हाळ्यात पहिला टँकर सुरू होतो. तालुक्याची तहान भागवण्यासाठी पालू लघुपाटबंधारे योजना मंजूर करून आणली आहे. सुमारे ५५ कोटी ४७लाखांची ही योजना आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (औरंगाबाद) यांनी त्याला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षों त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला. याचे पाणलोट क्षेत्र ४.४३ चौ. कि. मी. आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा २२४४.१५ स. घ. मी. एवढा आहे. १४७.०० हेक्टर सिंचन क्षमता आहे. योजनेची लांबी ३२७.०० मीटर, माथा रूंदी ४.५० मी. आहे. धरणाची माथा पातळी १३८.०० मी., सांडवा लांबी ५०.०० मीटर आहे. या कामाचा ठेका स्थानिक पातळीवर एका कंपनीला मिळाला आहे. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे समजते.
मी आमदार झाल्यानंतर पहिले काम काय केले तर टंचाईग्रस्त लांजा तालुक्याला टँकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि १०० टक्के हा तालुका टँकरमुक्त करणार, पालू लघुपाटबंधारे योजनेचे काम सुरू झाले आहे. या योजनेद्वारे प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी येणार आहे- किरण सामंत, आमदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 05/Feb/2025














