चिपळूण : वाळू अभावी बांधकामे, विकासकामांना खीळ

चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून वाळू उपशाला बंदी आहे. वाळू उत्खननास अधिकृत परवाने दिले जात नाहीत. परिणामी, नागरिकांच्या खासगी बांधकामांना तसेच विकासकामांना खीळ बसली आहे. हातपाटी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोकणातील प्रामुख्याने चिपळुणातील पारंपरिक हातपाटी व्यवसायाला शासनाने तातडीने परवाने द्यावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या संदर्भात माहिती देताना कदम म्हणाले की, कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात पारंपरिक हातपाटीचा व्यवसाय केला जातो. सध्या वाळू व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. त्याचे परिणाम पूर्णपणे बाजारपेठेवर होत आहे. वाळू नसल्यामुळे शासकीय विकासकामे थांबली आहेत त्याचबरोबर खासगी बांधकामेदेखील ठप्प आहेत. नागरिकांनी त्याच्या जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी अथवा नवीन बांधकामासाठीदेखील वाळू मिळत नाही.

वाळूअभावी विविध प्रकारची बांधकामे रखडली आहेत. बाजारपेठेतील उलाढालीवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. मध्यंतरी, हातपाटीला परवाने देण्याच्या निविदा निघाल्या; मात्र, ड्रेझारच्या माध्यमातून वाळू उत्खननास परवानगी नसल्याने हा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे अहवाल पाठवून मार्गदर्शन मागवले; मात्र, मुळातच हातपाटी वाळू व्यवसाय परवान्यांची निविदा काढलेली असताना व ड्रेझरद्वारे उत्खननाची निविदा नसतानादेखील केवळ हातपाटी बाळू व्यावसायिकांवर अन्याय करण्यासाठी परवाने दिले गेले नाहीत.

वाळू व्यवसायांना उभारी मिळावी
आता नव्याने सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळात याबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय व्हावा आणि हातपाटी वाळू व्यावसायिकांना न्याय मिळावा, वाळू व्यवसायांना पुन्हा एकदा उभारी मिळावी, यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार आहोत. निर्णय न झाल्यास आम्ही जनआंदोलन करू, असा इशारा कदम यांनी या वेळी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 07/Feb/2025