रत्नागिरी : पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी उत्तम राजकारण, न्यायदान, उद्योग, कला या सर्वांबरोबर मंदिरे बांधली, घाट बांधले. ते सर्व स्वतःच्या खासगी मालमत्तेमधून केले, असे प्रतिपादन हभप चिन्मयी डोंगरे यांनी केले.
राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानतर्फे मकर संक्रमण उत्सव व अहिल्याबाई त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात चिन्मयी डोंगरे यांनी कीर्तन केले. विमलाताई पित्रे विद्यार्थिनी वसतिगृहात हा कार्यक्रम झाला. त्यांनी पूर्वरंगात संत तुकाराम महाराज यांचा अभंग तर उत्तर रंगात अतिशय सुंदर असे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई यांचे चरित्र सुंदर गायन, दिंड्या यांसह संतपरंपरेतील विविध दाखले देत कार्यक्रमाचे कीर्तनरंग हे नाव सार्थ केले.
कार्यक्रमात आर्या जोशीने संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला विष्णुमय जग हा अभंग सादर केला. प्रास्ताविक जिल्हा सहबौद्धिक प्रमुख श्रेया सरदेशपांडे यांनी वसंतपंचमी, संक्रमणाचा भौगोलिक, सामाजिक अर्थ व रेणुका प्रतिष्ठानचे थोडक्यात कार्य सांगितले.
जिजामाता शाखा संपर्क प्रमुख अनुराधा ताटके यांनी कीर्तनकार चिन्मयी डोंगरे, संवादिनी वादक प्राची निमकर व तबलासाथ प्रसाद पटवर्धन यांचा परिचय करून दिला. रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दीपा पाटकर यांनी स्वागत केले. शहर सहसेवाप्रमुख वसुंधरा पटवर्धन यांनी संक्रमण गीत सादर केले. पूर्वरंगानंतर शहर व्यवस्थाप्रमुख संध्या जोशी यांनी चिन्मयी डोंगरे यांचा सन्मान केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 07-02-2025














