राजापूर : भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वनिधीतून तालुक्यातील तारळ येथे प्रवासी निवाराशेड उभारत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे एसटीसह अन्य गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आमदार चव्हाण यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, तारळ येथे उभारलेल्या प्रवासी निवाराशेडसह तारळ वावळेखाजनवाडी रस्त्याच्या करण्यात आलेल्या मजबुतीकरणासह डांबरीकरणाच्या कामाचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, जिल्ह्याचे सरचिटणीस अमित केतकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन, महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार, सरचिटणीस अमोल सिनकर, उपाध्यक्ष बाबू अवसरे, युवा मोर्चाचे जब्बार काझी, ओबीसी मोर्चाचे देवा भोसले, युवा मोर्चाचे विनायक कुवेसकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राजापूरसह रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह ग्रामस्थांची मोठी संख्या आहे. मात्र तारळ येथे सुसज्ज प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांसह आबालवृद्ध ग्रामस्थांचे हाल होत होते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवारा शेडची उभारणी व्हावी, अशी मागणी प्रवाशांसह ग्रामस्थांकडून केली जात होती.
त्याची तत्काळ दखल भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार चव्हाण यांनी घेत सामाजिक बांधिलकीतून स्वनिधीतून त्या ठिकाणी प्रवासी निवारा शेडची उभारणी केली आहे. त्यामुळे प्रवासी तसेच ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 14/Feb/2025














