पावस : पर्यटनाच्या दृष्टीने पावस पंचक्रोशीचा विचार केल्यास स्वच्छता अभियान केवळ कागदावरच राहिलेले दिसून येत आहे. पावस पंचक्रोशीतील गणेशगुळे, गावखडी, पूर्णगड, रनपार, वायंगणी या किनाऱ्यावरील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. त्यामुळे येथे पर्यटक येतात; परंतु अस्वच्छता असल्याने नाके मुरडतात. हे किनारे स्वच्छ केल्यास येथे पर्यटक थांबतील तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पावस परिसरामध्ये स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर व गणेशगुळे येथील गणेशमंदिर ही दोन धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच अनेक पर्यटक येथे येत असतात. या स्थळांबरोबर परिसरामध्ये गावखडी, गणेशगुळे, रनपार, वायंगणी असे चार समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ पाडतात; मात्र त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कोणत्याही अन्य सुविधा उपलब्ध नाहीत.
पर्यटक समुद्राचा थोडाफार आस्वाद घेतात आणि परततात. या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध केल्यास पर्यटकांना या ठिकाणी थांबवणे शक्य आहे. किनाऱ्यावर शौचालय, समुद्रामध्ये डुंबल्यानंतर पर्यटकांना खाण्यासाठी काही स्टॉल उभे राहिल्यास पर्यटकांची संख्या आपोआप वाढेल, स्थानिकांनी किनाऱ्यावर स्टॉल उभारल्यास त्यांनाही रोजगाराचे साधन निर्माण होऊ शकते. शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोली असा प्राथमिक गरजाही या किनाऱ्यावर नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते.
रत्नागिरी-राजापूर सागरी मार्गावर गावखडी समुद्रकिनारा प्रशस्त आहे; मात्र या किनाऱ्यावर प्रचंड अस्वच्छता आहे. या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र असल्यामुळे पर्यटकांसाठी ही पर्वणी असते, मात्र या ठिकाणी बांधण्यात आलेली शौचालये सध्या बंद आहेत. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना त्याचा काही उपयोग होत नाही. गणेशगुळे समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. गणेशमंदिरात येणाऱ्या पर्यटकांना या किनाऱ्यांची आपोआप भुरळ पडते, असे हे ठिकाण आहे.
येथील किनारा स्वच्छ आहे; परंतु या ठिकाणी शौचालय, कपडे बदलण्याची जागा पूर्वी होती; परंतु त्यानंतर त्याची दुरवस्था झाली आहे. या गावांमध्ये राहण्याची व्यवस्था असल्यामुळे आणि निसर्गरम्य परिसर असल्यामुळे अनेक पर्यटक येथे येतात. रनपार व वायंगणी या ठिकाणी समुद्रकिनारी आहेत; परंतु सोयीसुविधा नसल्यामुळे पर्यटक या किनाऱ्यावर म्हणावे तसे जात नाहीत.
गावखडी गावाला चांगला समुद्रकिनारा व सुरूबन, सागरीमार्ग लाभल्यामुळे या भागातून जाणारा व येणारा पर्यटक आपोआप समुद्राचा आनंद लुटण्यासाठी थांबतो. अशावेळी या पर्यटकांना आपल्या गावात बचतगटाच्या माध्यमातून तयार होणारी उत्पादने समुद्रकिनारी स्टॉल लावून बसल्यास चांगली बाजारपेठ बचतगटाच्या महिलांना उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी गटाच्या महिलांनी मानसिकता तयार केल्यास त्यांना इतरत्र कुठे न धावता गावातच केलेल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ तयार होऊ शकते. समिधा भाटकर, सीआरपी, बचतगट
जांभूळआड येथील जयंत फडके म्हणाले, कोकणचा समुद्रकिनारा म्हणजे गोव्याचा विसर पडावा, हे वैभव पर्यटकांना आकर्षित करते. अपरिचितः पण सुंदर किनाऱ्यावर पोचण्यासाठी तितकेच चांगले ग्रामीण रस्ते बनायला हवेत. स्वच्छ, सुरक्षित शौचालय हवीत. निवांत राहता येईल, अशी कोकणीपणा जपणारी निवासस्थाने हवीत, प्लास्टिकने भरलेले किनारे वेळेवर साफ करायला हवेत.
जयंत फडके, प्रगतीशिल शेतकरी, जांभूळआड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 15/Feb/2025













