रत्नागिरी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे जमा करावी लागणार कागदपत्रे

रत्नागिरी : शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनेक आर्थिक दुर्बल लाभार्थ्यांना मदत मिळते. मात्र आता या निराधारांना डीबीटी प्रक्रियेत कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्या लाभार्थ्यांकडून जोपर्यंत कागदपत्रे – जमा केली जाणार नाहीत, तोपर्यंत लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून निराधारांसाठी संजय गांधी आणि श्रावण बाळ अशा दोन योजना आणि केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग तीन राष्ट्रीय योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आता शासनाने त्यांची कागदपत्रेही डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय
घेतला आहे.

त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे या प्रक्रियेद्वारे जमा केली असेल त्यांनाच लाभ मिळणार आहे. ही कागदपत्रे लवकर जमा करावी लागणार आहेत.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण २२ हजार ७६७ लाभार्थी, श्रावण बाळ योजना १६ हजार ५७४, वृद्धपकाळ ७ हजार ७७५, विधवा १ हजार ३७२ लाभार्थी, तर दिव्यांग २३१ असे शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. निराधार योजनांच्या लाभार्थ्यांचे वेतन बरेचदा अनियमित होत असते, त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. त्यातच शासनाने नवा आदेश काढला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या लाभार्थ्यांचे वेतन थेट खात्यात जमा होणार आहे. मात्र जे लाभार्थी डीबीटी प्रणाली मार्फत कागदपत्रे जमा करणार नाहीत. त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार नाही असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 17/Feb/2025